मनोज जरांगे पाटलांना मुंबईतील आझाद मैदानावर मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांसाठी उपोषणास आणि आंदोलनास मुंबई पोलिसांकडून परवानगी देण्यात आली आहे.
मात्र, काही अटींवर त्यांना ही परवानगी देण्यात आली आहे.आंदोलनादरम्यान जर आंदोलकांनी या अटी व शर्तीचं उल्लंघन केल्यास किंवा कायदयाचा भंग केल्यास हे आंदोलन हे बेकायदेशीर घोषित करुन त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांना देण्यात आला आहे.26 ऑगस्टला पत्राद्वारे उच्च न्यायालयाचा अंतरिम आदेश व नियमावली यांची प्रत मनोज जरांगे यांना देण्यात आलेली आहे. आझाद मैदान परिसरातील रहिवाशांना, रहदारीला कमीत-कमी अडथळा येईल, तसेच आंदोलकांसाठी पुरेशी जागा देखील उपलब्ध होईल या गोष्टींचा विचार या अटी-शर्तींमध्ये करण्यात आल्याचं म्हटलं आहे.
1) आंदोलनास एकावेळी फक्त एका दिवसासाठी परवानगी देण्यात येईल. शनिवार, रविवार व शासकीय किंवा सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कोणत्याही परवानग्या देण्यात येणार नाहीत.
2) ठराविक वाहनांना परवानगी देण्यात आलेली असून वाहनतळासाठी वाहतूक पोलिसांशी विचारविनिमय करून परवानगी देण्यात येईल. तसेच आंदोलकांच्या वाहनांनी मुंबईत प्रवेश केल्यानंतर ईस्टर्न फ्री वे या रस्त्यानं वाडीबंदर जंक्शन पर्यंत येतील. त्यापुढे मुख्य आंदोलकासोबत फक्त पाच वाहनं आझाद मैदानावर जातील व इतर सर्व वाहनं ही वाडीबंदर येथून पोलिसांनी निर्देशित केलेल्या शिवडी, ए शेड व कॉटनग्रीन परिसरात पार्किंगसाठी न्यावी लागतील. 3) 5000 आंदोलकांना सामावून घेईल एवढं 7000 स्क्वेअर मीटर क्षेत्र आंदोलनासाठी राखीव ठेवण्यात आलं आहे. मात्र, या जागेमध्ये इतर आंदोलकांनाही परवानगी देण्यात आल्यामुळे या 5000 आंदोलकांमध्ये मनोज जरांगेंच्या आंदोलकांसह त्यांचाही समावेश असणार आहे.
मराठा मोर्चाला आझाद मैदानात परवानगी देऊ नये, या संदर्भात दाखल झालेल्या जनहितयाचिकेवर 26 ऑगस्ट रोजी मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली.
नवी मुंबईत खारघर किंवा अन्यत्र परवानगी देण्याची राज्य सरकारला मुभा असल्याचंही हायकोर्टानं म्हटलं होतं.
परवानगीविना त्यांना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही, म्हणत हाय कोर्टाने मनाई केली होती.
गणेशोत्सवाला सुरुवात झाली असून या काळात आंदोलन नको यासाठी सरकारकडून त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्नही सुरु होते. परंतु, ते आपल्या मागणीवर ठाम राहिले होते.

आता अंतरवाली सराटीतून त्यांच्या यात्रेला सुरुवात झाली आहे. कितीही दिवस लागले तरी संघर्ष सुरु ठेवायचा, असं जरांगे म्हणाले आहेत.
आम्ही कोर्टाचा सन्मान करतो, परंतु, हा सगळा खेळ सरकारचा असून चूक झाकण्यासाठी देव-देवतांना पुढे केलं जातंय. परंतु, कितीही आडकाठी केली तरी सगळे नियम पाळून आम्ही आझाद मैदानात उपोषण करणारच, असंही जरांगे पाटील मुंबईकडे निघण्यापूर्वी आयोजित प्रेस रिलिजमध्ये म्हणाले आहेत.
मराठा समाजाला आरक्षण मिळावं, या मागणीसाठी आदोलक मनोज जरांगे पाटील मुंबईत येण्यावर ठाम आहेत. मात्र, दुसरीकडे मुंबई हायकोर्टानं मनोज जरांगेंना आझाद मैदानात आंदोलन करण्यास मनाई केली होती. त्याला आता काही अटींवर परवानगी देण्यात आली आहे.
Post a Comment
0 Comments