जरांगे यांच्या आंदोलनावर काय तोडगा काढता येईल, यावर सरकारमध्ये खल चालू आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञ, कायदेविषय सल्लागार यांच्याशी सरकार सल्लामसलत करत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच आता मराठा आरक्षणाविषयी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. मराठा समाजाची मागणी आणि जरांगे यांची भूमिका यावर फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.
मनोज जरांगे पाटील ज्या मागण्या करत आहेत त्याच्याकडे आम्ही सकारात्मकने पाहात आहोत. ते मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करावा अशी मागणी केली जात आहे. पण न्यायालयाचे काही निर्णय आलेले आहेत. या निर्णयांचा आपल्याला अवमान करता येणार नाही. कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन अशी मागणी केली जात असेल आणि लोकांना खुश करण्यासाठी तसा निर्णय सरकराने घेतलाच तर तो एकही दिवस टिकणार नाही, असे स्पष्ट मत फडणवीस यांनी व्यक्त केले. तसेच कायद्याच्या बाहेर निर्णय झालाच तर मराठा समाजाची फसवणूक झाल्याची भावना तयार होईल, असेही मत फडणवीस यांनी सांगितले.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आपण शिंदे समिती तयार केली. शिंदे समितीमुळे बऱ्याच कुणबी नोंदी सापडल्या. आता हैदराबाद गॅझेटचं कामही आपण निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्याकडेच दिलेले आहे. पण आम्हाला आताच आणि इथेच आरक्षण द्या असे जरांगे यांचे मत आहे. हे आरक्षण देण्यासाठी ज्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच आरक्षण द्यावे लागेल. या प्रक्रिया पूर्ण न करता ते कसे शक्य आहे, असा सवाल फडणवीस यांनी व्यक्त केला. तसेच निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांनी स्वत: आझाद मैदानावर जाऊन काय प्रक्रिया आहे हे सांगितले. शेवटी सर्वांनी चर्चा केल्यावर मार्ग निघेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
जरांगे आपल्या उपोषणादरम्यान सातत्याने फडणवीस यांना लक्ष्य करत आहेत. यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मला उपहास सहन करणे, शिव्या खाणे याची मला सवय आहे. माझ्यावर याचा काहीही परिणाम होत नाही. कारण लोक तुम्हाला तुमच्या कर्तृत्त्वाने लक्षात ठेवतात. आपले कर्तृत्व काय आहे हे महत्त्वाचे आहे. मला कोणीही कितीही शिव्या दिल्या तरी जे समाजाच्या हिताचे आहे आणि जे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने सांगितलेले आहे त्याच्या बाहेर मी जाऊ शकत नाही आणि जाणारही नाही, असेही फडणवीस यांनी ठणकावून सांगितले.
मनोज जरांगे यांच्या मनासारखा निर्णय घेतला जाणार का? असाही सवाल त्यांना विचारण्यात आला. यावर बोलताना जरांगे यांना काय पटेल हे मी कसे सांगणार. मला त्यांच्या मनात शिरता आले असते तर आझाद मैदानावरील आंदोलनच संपले असते, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे आता मराठा आरक्षणासंदर्बभात नेमकं काय होणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.
Post a Comment
0 Comments